लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या जीवन संघर्षाची यशोगाथा___ प्रा युवराज कापसे
कराड - प्रतिनिधी.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने लेखन प्रेरणा दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे: साहित्याचा अनमोल ठेवा या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. प्रमुख व्याख्याते प्रा. युवराज कापसे होते आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या जीवन संघर्षाची यशोगाथा होय. सर्वसामान्य माणूस जीवन जगत असताना अनेक अडचणीतून संघर्षातून जात असतो. त्याच्या पदरी प्रचंड दुःख, दारिद्र्य आहे. या सर्व संकटातून तो जगण्याचा मार्ग शोधतोय. हेच अण्णाभाऊंच्या साहित्यातून आपल्याला पहावयास मिळते. गावासाठी धडपडणारा फकीरा असेल, महिला अत्याचाराविरुद्ध लढणारा वारणेचा वाघ सत्यपा असेल. अशी एक ना दोन अनेक उदाहरणे कथा कादंबऱ्यांच्या रूपाने अण्णाभाऊंच्या साहित्यात मिळतात. अण्णाभाऊंनी 35 पेक्षा जास्त कथा कादंबऱ्या लेखन केले. हेच साहित्य समाज परिवर्तनाचे साधन ठरले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. अण्णाभाऊंच्या कादंबरी वरती अनेक चित्रपट तयार झाले. अण्णाभाऊंच्या लेखन साहित्याचा गाजावाजा रशियात देखील झाला. त्यांना रेमेन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. अण्णाभाऊ म्हणतात पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावरती तरलेली नसून कामगारांच्या तळ हातावर तरलेली आहे. या त्यांच्या लेखनातूनच कामगारांच्या विषयीची तळमळ दिसून येते.अशा या थोर अण्णाभाऊना जयंती दिनानिमित्त मी अभिवादन करतो!
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, परंपरागत जातीयवादाच्या विषमतेने भरलेल्या समाजाला आपल्या साहित्यातून जागे करण्याचे कार्य लोकशाहीर अण्णाभाऊंनी केले. त्यांनी पोवाडे रचले व गायले. कथा कादंबऱ्यांची निर्मिती केली आणि हेच साहित्य आज अजरामर ठरले आहे. कामगारांच्या आयुष्यातील अनेक व्यथा वेदना त्यांनी आपल्या साहित्यात मांडल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे यांनी केले.आभार ज्युनिअर विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सुरेश यादव यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. स्वाती मोरकळ यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. जयदीप चव्हाण, प्रा. संभाजी पाटील, प्रा. तेजस्विनी दळे डॉ. मारुती सूर्यवंशी, शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश पाटील, वसंत कांबळे, व पंकज कुंभार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments