सामाजिक विषमतेच्या अंधकारावर समतेचा प्रकाश टाकणारा क्रांतीसुर्य म्हणजे म. ज्योतिबा फुले___सुरेश यादव
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताह व महात्मा फुले जयंती द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांचे वतीने महात्मा फुले: जीवन व कार्य या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुरेश यादव होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, सामाजिक विषमतेच्या अंधकारावर समतेचा प्रकाश टाकणारा क्रांतीसुर्य म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय. हजारो वर्षाच्या सामाजिक गुलामगिरीत संपूर्ण बहुजन समाज देशात अडकलेला होता. अन्याय, अज्ञान, अस्पृश्यता, जातीभेद या समस्यांनी संपूर्ण समाज गुरफटलेला होता. अशा परिस्थितीत महात्मा फुलेंनी सामाजिक समतेची चळवळ सुरू केली . स्वतःची पत्नी सावित्रीबाईंना शिक्षित करून इतर स्त्रियांना शिकवायला लावले. स्त्री शिक्षणास सुरुवात केली. अनेक शाळा सुरू केल्या. अन्याय अत्याचार झालेले स्त्रियांच्यासाठी पाळणाघरे सुरू केली. अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी स्वतःचा पानवठा उपलब्ध करून दिला. ब्रिटिश राजपुत्रा पुढे भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा महात्मा फुले यांनी रचला. महात्मा फुले हे गर्भ श्रीमंत होते. त्यांची स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी होती. सुखांचा उपभोग घेण्यापेक्षा समाजसेवेचे व्रत त्यांनी ठेवले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, या देशात सामाजिक समता चळवळीचे मुख्य प्रेरणास्थान म्हणजे महात्मा फुले होत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा फुले या पती-पत्नींनी दिनदलित व सर्व समाजातील स्त्रिया यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. या अन्याया मागचे मुख्य कारण अज्ञान आहे. हे त्यांनी ओळखले व शिक्षणाचा प्रचार प्रसार केला. शाळा सुरू केल्या व समाज घडविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुलेंचे कार्य भविष्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेले. आज जयंतीदिनानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो!
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रघुनाथ गवळी कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले. आभार प्रा. विश्वनाथ सुतार यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा. मनाली रानडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व प्राध्यापक गुरुदेव कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments