विद्यार्थ्यांनों साहित्य-लेखन व सादरीकरण क्षेत्रातील करिअर संधी ओळखा___ डॉ. अनिलकुमार वावरे
छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्रेमचंद जयंती निमित्त फिल्म स्क्रीनिंग व चर्चा संपन्न.
सातारा - प्रतिनिधी.
साहित्य केवळ मनोरंजनासाठी नसते तर साहित्य मानवी जीवनासाठी दिशादर्शक असते.साहित्यातून लेखक विचारांची पेरणी करत असतात. प्रेमचंदानी आपल्या साहित्यातून मानवी कल्याणाकारी विचारांवर भर दिला. प्रेमचंद यांनी आपल्या साहित्यातून भारतीय समाज जीवनातील गरिबी, सावकारी,आर्थिक विषमता, अंधश्रद्धा, कर्मकांड , जातिभेद इ.प्रश्नाबरोबर शेतकरी, कष्टकरी ,वंचित व दलितांचे मांडलेले प्रश्न आजही पूर्णपणे संपलेले नाहीत. आज साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या पारंपरिक पद्धतीत बदल होऊन साहित्य पीडीएफ, ऑडिओ, व्हिडिओ स्वरुपात प्रभावीपणे पोहचवले जात आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी मीडिया व फिल्म क्षेत्रातील करिअर ओळखावे व ऑडिओ , व्हिडिओ निर्मिती, संवाद लेखन, गीत लेखन व अभिनय आणि कॅमेरा बाबतचे तांत्रिक ज्ञान इत्यादी कौशल्य अवगत केल्यास या क्षेत्रात चांगले करिअर करता येईल. असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रोफेसर डॉ. अनिलकुमार वावरे यांनी केले. ते छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी विभाग व हिंदी साहित्य भारती (महाराष्ट्र प्रदेश) यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदीचे प्रसिद्ध लेखक प्रेमचंद यांच्या 146 व्या जयंती निमित्त प्रेमचंद यांच्या साहित्यावर आधारित फिल्म स्क्रीनिंग व चर्चेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे होते. फिल्म स्क्रीनिंग नंतर झालेल्या चर्चेत प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी फिल्म स्क्रिनिंग उपक्रम अभ्यासपूरक व फिल्म क्षेत्रातील रोजगार संधी समजण्यास उपयुक्त असल्याचे सांगितले. डॉ. मोरे यांनी सांगितले की प्रेमचंदाच्या कथांचे विषय सामाजिक आहेत. या कथा वाचकांना समाजातील प्रश्न समजून घेण्यास व प्रश्न सोडवण्यासाठी प्रेमचंदांनी सुचवलेले उपाय वाचकांना एक चांगला नागरिक होण्यासाठी मार्गदर्शक आहेत. प्रेमचंद यांनी लिहिलेल्या तीनशे कथा , अठरा कादंबऱ्या व तीन नाटक आणि पत्रकार म्हणून केलेले लेखन वास्तविक व आदर्शवादी आहे. त्यांचे लेखन स्वातंत्र्य आंदोलन काळात जनजागृती करिता उपयुक्तत ठरले होते. प्रेमचंद यांच्या कथा कादंबरी मधील सर्वसामान्य वर्गातील पात्रे संघर्षशील दिसतात. प्रेमचंद यांच्या साहित्यातील मूल्य विचारांत स्वातंत्र्य, बंधूभाव व सर्व पातळीवरील समानता हे मध्यवर्ती सूत्र आढळते. प्रेमचंदांच्या साहित्यातील गांधीवादी व मार्क्सवादी विचारात त्यांची सामाजिक सुधारणांची तळमळ दिसते. हिंदी विभागाने आयोजित केलेला नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांना साहित्य समजून घेण्याकरिता व त्यामध्ये करिअर करण्यास उपयुक्त ठरेल. सहभागी विद्यार्थ्यांनी चर्चेत सहभागी होताना साहित्यावरती बनवलेल्या फिल्ममुळे साहित्य कृती लक्षात राहण्यास उपयुक्त वाटत असल्याचे सांगितले.तसेच कथेचे पटकथेतील रुपांतर व फिल्म माध्यमातील स्वरुप याबाबत माहिती मिळाल्याचे व जिज्ञासा निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. हा उपक्रम हिंदी भाषेबद्दल गोडी वाढवणारा तसेच हिंदी भाषेच्या अध्ययनातून करिअरचे मार्ग समजण्यास उपयुक्त ठरल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले. यावेळी प्रेमचंद यांच्या उपन्यास साहित्याचा परिचय डॉ. संदीप किर्दत यांनी, कहानी साहित्याचा परिचय प्रा. सोमनाथ कोळी व प्रा. आरती कुंभार यांनी तर नाटक साहित्याचा परिचय डॉ. प्रदीप शिंदे यांनी करुन दिला. तर फिल्म स्क्रिनिंगचे संचलन व या क्षेत्रातील रोजगार संधींची माहिती उपक्रमाचे समन्वयक डॉ. संदीप किर्दत यांनी करुन दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ कोळी यांनी केले तर आभार प्रोफेसर डॉ. सादिक तांबोळी यांनी मानले. यावेळी पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments