निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाला निवेदन
कराड -प्रतिनिधी.
"निसर्ग वाचला तरच मानवजात वाचेल" हा केवळ मंत्र नसून ती काळाची गरज आहे, असा आर्त साद घालत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाने प्रशासनाचे दार ठोठावले आहे. उन्हाळ्याच्या तडाख्याने होरपळणाऱ्या रानावनात सध्या मानवनिर्मित वणव्यांचे अक्राळविक्राळ रूप पाहायला मिळत असून, याविरोधात प्रशासनाने 'पर्यावरण संरक्षण कायद्या'चा बडगा उचलावा, या मागणीसाठी आज वन विभाग व सामाजिक वनीकरण कार्यालय सातारा येथे संवेदनशील निवेदन सादरीकरण करण्यात आले.
हे निवेदन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष प्रमोद दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक वनीकरण विभागाचे सहायक वनसंरक्षक दिगंबर जाधव, सामाजिक वनीकरण विभागाचे मुख्य लेखापाल एस. एस. खोत यांना निवेदन देण्यात आले.
वणवा केवळ आग नव्हे, तर जैवविविधतेचा 'संहार' गेल्या चार दशकांपासून पर्यावरण चळवळीत सक्रिय असलेल्या या मंडळाने निवेदनात नमूद केले की, वणवा म्हणजे केवळ झाडे जळणे नव्हे, तर त्यासोबत त्या परिसरातील दुर्मिळ वनौषधी, मुके प्राणी, पक्षी आणि त्यांच्या घरट्यांचा होणारा अमानुष 'नरसंहार' आहे. वाढते तापमान आणि पावसाचे बिघडलेले चक्र हे या वणव्यांचेच फलित असल्याचे सांगत, मंडळाने निवेदन देऊन न थांबता, मंडळाने प्रशासनासमोर ५ कलमी कृती आराखडा मांडला आहे. यामध्ये वनक्षेत्रात 'फायर लाईन्स' तयार करणे, उपग्रह तंत्रज्ञानाचा (Satellite Alerts) वापर करून त्वरित प्रतिसाद यंत्रणा उभारणे आणि वणवा लावणाऱ्या समाजकंटकांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन देताना निसर्ग व पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे सातारा जिल्हा अध्यक्ष नामदेव जगदाळे, उपाध्यक्ष संजय बारंगळे, सविता बारंगळे, अनिकेत करंजे, निखिल जगदाळे, मोहनराव पाटील, आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना अध्यक्ष नामदेव जगदाळे म्हणाले की, "आपण सर्वांनी वनसंपदा जपण्यासाठी काम केले तर येणारी पिढी समृध्द होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. "प्रशासनाने ही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
"वनराई ही आपली आई आहे, तिला वणव्याच्या आगीत होरपळताना पाहणे हे मानवतेचे अपयश आहे. कायद्याची कठोरता आणि समाजाची संवेदनशीलता एकत्र आली तरच आपले जंगल सुरक्षित राहील."
______राज्याध्यक्ष प्रमोद दादा मोरे.


Post a Comment
0 Comments