बाबासाहेबांचे स्वप्न आणि आजचा वास्तव भारत.
भारतीय समाजव्यवस्थेच्या मुळाशी असलेली विषमता, अन्याय आणि भेदभाव यांना छेद देत एका महामानवाने या देशाला नवा विचार दिला— तो म्हणजे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे जन्मलेल्या या थोर व्यक्तिमत्त्वाने केवळ स्वतःच्या संघर्षातून उभारी घेतली नाही, तर कोट्यवधी वंचितांना नवजीवन दिले.लहानपणापासूनच जातीभेदाच्या कठोर अनुभवांना सामोरे जात, शाळेत अपमान सहन करत त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. ज्ञान हेच परिवर्तनाचे सर्वात मोठे शस्त्र आहे, याची जाणीव ठेवून त्यांनी मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे उच्च शिक्षण घेतले आणि भारतातील सर्वाधिक विद्वान नेत्यांमध्ये स्थान मिळवले.स्वतंत्र भारताच्या उभारणीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारित संविधान घडवले, जे २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आले. या संविधानाने समाजातील प्रत्येक घटकाला हक्क दिले, पण आजही ते हक्क प्रत्यक्षात सर्वांपर्यंत पोहोचले आहेत का, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.अस्पृश्यतेविरुद्धचा त्यांचा लढा हा सामाजिक क्रांतीचा महत्त्वाचा अध्याय आहे. १९२७ मधील महाड चवदार तळे सत्याग्रह आणि १९३० मधील नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन यांमधून त्यांनी समाजातील अन्यायाला थेट आव्हान दिले. पुढे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारत समता आणि मानवतेचा नवा संदेश दिला.कामगार हक्क, आर्थिक सुधारणा आणि महिला सशक्तीकरण या क्षेत्रातही त्यांचे कार्य दूरगामी ठरले. महिलांना समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हिंदू कोड बिलासाठी संघर्ष केला; पण त्याला विरोध झाल्यामुळे त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देण्यासही मागे-पुढे पाहिले नाही. कारण तत्त्वांशी तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नव्हते.उद्या त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरात अभिवादनाचा वर्षाव होईल, पुतळ्यांना हार घातले जातील आणि विचारांचे पोस्टर झळकतील. मात्र या सगळ्या औपचारिकतेच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे— आपण खरोखरच त्यांच्या विचारांच्या दिशेने चाललो आहोत का?
आजही जात, धर्म आणि लिंग या आधारांवर भेदभाव होत असल्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. काही मुलींना शिक्षण नाकारले जाते, काहींना स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार दिला जात नाही. शिक्षणाचा प्रसार झाला असला, तरी त्यातून सामाजिक जाणीव आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद निर्माण होत आहे का, हा प्रश्न अधिक गंभीर आहे. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!” हा संदेश आज केवळ घोषवाक्यापुरता मर्यादित राहिला आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे.सोशल मीडियाच्या युगात बाबासाहेबांचे फोटो आणि विचार मोठ्या प्रमाणावर शेअर होतात, पण ते विचार आपल्या कृतीत कितपत उतरतात, हेच खरे मोजमाप ठरते. बाबासाहेबांचे अनुयायी होणे म्हणजे त्यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होणे नव्हे, तर त्यांच्या विचारांना आपल्या जीवनाचा भाग बनवणे होय.
आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने केवळ अभिवादन न करता आत्मपरीक्षणाची गरज आहे. कारण डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी दिलेला विचार हा केवळ इतिहास नाही, तर आजच्या भारताला दिशा देणारा दीपस्तंभ आहे. त्यांच्या स्वप्नातील समानतेचा समाज निर्माण करण्यासाठी अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे— आणि तो पल्ला गाठण्यासाठी शब्द नव्हे, तर कृतीचीच गरज आहे.
सौ. रेखा शशिकांत धुळप
महिला महाविद्यालय कराड


Post a Comment
0 Comments