चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणजे मानवी हक्काच्या लढ्याचे प्रतीक______ प्रा. सचिन बोलाईकर
कराड - प्रतिनिधी.
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांचे वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह निमित्त विशेष व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा. सचिन बोलाईकर होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणजे मानवी हक्काच्या लढ्याचे प्रतीक होय. ज्या संस्कृतीने जनावरापेक्षाही हीन वागणूक अस्पृश्यतेच्या नावाखाली दिन दलित माणसांना दिलेली होती. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पिण्याच्या पाण्याचा देखील हक्क नव्हता. ब्रिटिशांनी देशातील सार्वजनिक मालमत्तेच्या वापराचा समान अधिकार कायद्याद्वारे देण्याचा प्रयत्न केला परंतु हजारो वर्षे सुरू असलेल्या जातीवादी विचारांच्या लोकांना हे मान्य नव्हते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर उच्च विद्या विभूषित होते. काही पुरोगामी लोकांच्या सहाय्याने हा लढा उभा केला व यशस्वी केला. त्यामध्ये चित्रे, सहस्त्रबुद्धे अशी पुरोगामी मंडळीही होती. तळ्याचे पाणी पिणे हा इतकाच उद्देश या सत्याग्रहामागे नव्हता तर वर्षानुवर्षे दलित समाजाला पाणी पिण्याचे हक्क डावलले होते त्याचे हे प्रतीक होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, मनुस्मृतीने संपूर्ण समाजाला बंदिस्त करून ठेवलेले होते . स्त्रिया आणि दलित यांच्या विषयी प्रचंड अन्यायकारक नियम होते. या अन्यायाविरुद्ध सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आवाज उठवला. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जगण्याचे हक्क मिळाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे यांनी केले. आभार प्रा. अण्णासाहेब पाटील यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मी जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रघुनाथ गवळी, सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्युनिअर विभाग प्रा. सुरेश यादव, ज्युनियर पर्यवेक्षक प्रा. सुरेश रजपूत उपस्थित होते. तसेच विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments