चिंचोली ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश.
महामार्ग अभियंत्यांकडून तातडीने कामाची हमी व तातडीने खड्डा भरण्याचे काम सुरू.
मागण्या पूर्ण न झाल्यास प्रकाश जाधव यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा.
शिराळा :- प्रतिनिधी.( नानासाहेब कांबळे.)
कराड-मलकापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर चिंचोली (ता. शिराळा) गावच्या हद्दीत वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी आणि रस्ते दुरुस्तीसाठी चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने पुकारलेले आंदोलन यशस्वी झाले आहे. महामार्ग उपविभागीय अभियंता (मार्ग प्रकल्प उपविभाग, कराड) निलेश ढेरे यांनी तातडीने कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन शांततेत संपन्न झाले. आंदोलनानंतर 2 तासात काम सुरू.
लोकप्रतिनिधी आणि मंडळांची एकजूट
हे आंदोलन प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी चिंचोलीच्या सरपंच कविता पाटील, उपसरपंच रणजीत पाटील, माजी सरपंच शरद जाधव, सुरेश जाधव, तानाजी जाधव ,सुनील घोलप, हिंदुराव जाधव, शिवाजी जाधव, विश्वास जाधव, रामचंद्र जाधवबापू, धनाजी जाधव, भगवान जाधव, प्रल्हाद जाधव,विकास गुरव,सूरज जाधव, अनिल घोडे पाटील व विनोद पन्हाळकर, संतोष चव्हाण, भगवान जाधव,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाला गावातील शिवराय गणेश मंडळ, बालवीर गणेश मंडळ, शिवशक्ती गणेश मंडळ, झुंझार गणेश मंडळ आणि अण्णाभाऊ साठे गणेश मंडळ यांसह विविध मंडळांचे प्रतिनिधी व युवा कार्यकर्त्यांनी सक्रिय पाठिंबा दर्शवला.
नियमांनुसार काम करण्याची प्रशासनाची ग्वाही
चिंचोली बस स्टँड येथील ९० अंशाचे जीवघेणे वळण, जिल्हा परिषद शाळेजवळील धोकादायक रस्ता आणि जानवे वस्तीजवळील ओढ्यावरील पुलापाशी खचलेला महामार्ग या समस्यांबाबत ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती.
यावेळी महामार्ग उपविभागीय अभियंत्यांनी स्पष्ट केले की, महामार्गावरील दिशादर्शक फलक, शाळा परिसर आणि धोक्याच्या सूचना देणारे फलक हे भारतीय रस्ते (IRC: 67-2012) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीच्या नियमांनुसार लावले जातील. तसेच, मेनी फाटा ते खुजगाव दरम्यान बसवण्यात आलेल्या गतिरोधकांबाबत, "गतिरोधक काही अंतरावर आहेत" असे आगाऊ सूचना देणारे फलकही लावण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.
पुन्हा आंदोलनाचा इशारा
आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रकाश जाधव यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले की, "प्रशासनाने दिलेली कामाची हमी केवळ कागदावर राहू नये. ही कामे निश्चित वेळेत पूर्ण होणे ही काळाची गरज आहे. जर कामात दिरंगाई झाली किंवा प्रशासनाने टाळाटाळ केली, तर भविष्यात चिंचोली ग्रामस्थ यापेक्षा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून महामार्ग रोखून धरतील."


Post a Comment
0 Comments