मातृभाषा आणि जागतिक भाषा : मुळं मातीत, पंख आकाशात
संस्कृतमध्ये एक सुंदर उक्ती आहे —
“जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी”
(जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत.)
ही उक्ती केवळ मातेला आणि भूमीला लागू होत नाही; तर त्या मातृसंस्कृतीला आणि मातृभाषेलाही लागू होते. भाषा ही संस्कृतीची आत्मा असते. व्यक्तीची पहिली ओळख तिच्या मातृभाषेतूनच घडते. बालपणी आईच्या कुशीत ऐकलेली गोष्ट, अंगाईगीत, पहिली कविता — हे सर्व मातृभाषेतूनच मनात साठत जाते. त्यामुळे शिक्षणाच्या प्रारंभीच्या टप्प्यावर मातृभाषेला केंद्रस्थानी ठेवणे हे केवळ भावनिक नव्हे तर शैक्षणिकदृष्ट्याही योग्य आहे.
संशोधन स्पष्ट सांगते की बालकाला संकल्पना मातृभाषेत अधिक सुलभतेने समजतात. विचारशक्ती, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास यांची पायाभरणी मातृभाषेतूनच होते. म्हणूनच प्राथमिक स्तरावर मातृभाषा-आधारित शिक्षणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
परंतु या वास्तवासोबत दुसरेही एक वास्तव आहे — आजचे जग जागतिक आहे. ज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, संशोधन आणि प्रशासन यांची दारे बहुभाषिक कौशल्यांमुळे उघडतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करायची असेल, राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायचे असेल तर इंग्रजीसह इतर भाषांचे ज्ञान अत्यावश्यक आहे.
म्हणूनच प्रश्न हा “मातृभाषा की परभाषा?” असा नसून “मातृभाषा आणि परभाषा यांचा समन्वय कसा?” असा असला पाहिजे.
मातृभाषा ही आपली “आई” आहे. ती आपल्याला विचारांची मुळं देते, संस्कारांची शिदोरी देते. परंतु आयुष्याच्या प्रवासात पुढे जाण्यासाठी, व्यापक जगाशी संवाद साधण्यासाठी आणि नवीन संधी मिळवण्यासाठी इतर भाषांचे ज्ञान आवश्यक ठरते. जसे मूल आईच्या कुशीत वाढते; पण शिक्षण, रोजगार आणि अनुभवासाठी घराबाहेर पडते, तसेच भाषांचे नाते आहे. मुळाशी जोडून ठेवणारी मातृभाषा आणि जगाशी जोडणाऱ्या इतर भाषा — दोन्हींचा समन्वयच विकासाचा मार्ग आहे.
आज काही ठिकाणी भाषेच्या नावावर अतिरेकी भूमिका घेतल्या जातात. एकीकडे परभाषेचा अतिरेक, तर दुसरीकडे मातृभाषेचे अंध समर्थन — या दोन्ही टोकांच्या भूमिका समाजाला उपयुक्त नाहीत. खरा मार्ग मधला आहे — संतुलित, समन्वयवादी आणि प्रगतिशील.
शैक्षणिक स्तरावर काय करावे?
प्राथमिक शिक्षण मातृभाषेत असावे; त्याचवेळी इतर भाषांची मजबूत पायाभरणी व्हावी.माध्यमिक स्तरावर द्विभाषिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना दोन्ही भाषांमध्ये संकल्पना व्यक्त करता येतील अशी क्षमता विकसित करावी.उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर संशोधन मातृभाषेतही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही व्हावे.ज्ञानाची देवाणघेवाण द्विमार्गी असावी.
समाज आणि कुटुंबाची भूमिका
घरात मातृभाषेचा सन्मान असावा. मुलांशी संवाद, वाचन आणि सांस्कृतिक परंपरा मातृभाषेतून जोपासाव्यात. त्याचवेळी मुलांना इतर भाषा शिकण्यास प्रोत्साहन द्यावे. भाषिक श्रेष्ठत्वाऐवजी भाषिक समृद्धीचा दृष्टिकोन स्वीकारणे ही काळाची गरज आहे.
निष्कर्ष
भाषा ही स्पर्धेची नव्हे तर सहअस्तित्वाची गोष्ट आहे. मातृभाषा जपली तर संस्कृती टिकते; इतर भाषा आत्मसात केल्या तर संधी वाढतात. त्यामुळे आजच्या पिढीने “मुळं मातीत आणि पंख आकाशात” ही भूमिका स्वीकारली पाहिजे.
सौ. रेखा शशिकांत धुळप
महिला महाविद्यालय, कराड


Post a Comment
0 Comments