हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील शिक्षणात सुद्धा छत्रपती शिवाजी कॉलेज जपते विद्यार्थ्यांचे करिअर आणि सामाजिक बांधिलकी - प्रा. डॉ. धनंजय नलावडे
सातारा - प्रतिनिधी.
एकविसाव्या शतकात माणसाने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. समाजाचा कल हा भौतिक सुख सुविधा, पर्यटन व हॉटेलिंग करण्याकडे वाढलेला दिसून येतो. त्यांमुळे मानवी गरजा ओळखून पारंपरिक व्यावसायिक अभ्यासक्रमा बरोबरच काळानुरूप नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक क्षेत्रात आले आहेत. रयत शिक्षण संस्थेने सन १९४७ ची स्थापना असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ पासून बी.ए. हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग हा तीन वर्षांचा विद्यापीठ व शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरु केला आहे. त्यांमुळे साताराच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातील होतकरु विद्यार्थ्यांचे हॉटेल इंडस्ट्री मध्ये करिअर करायचे दरवाजे खुले झाले आहेत. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुणे व मुंबईच्या तुलनेत अतिशय माफक फी मध्ये प्रवेश व होस्टेल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच 'मागेल त्याला काम' या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना काम करीत शिक्षण पूर्ण करता येते. कॉलेज कडून मोफत ब्लेझर , शर्ट व पॅन्ट असा एक गणवेश दिला जातो. एकप्रकारे छत्रपती शिवाजी कॉलेज मधील हा विभाग केवळ विद्यार्थ्यांचे उत्तम करिअरच करण्यासाठी धडपडत नाही तर सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांमध्ये रयत कल्चर रुजवताना दिसत आहे. असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डॉ. धनंजय नलवडे यांनी काढले. ते छत्रपती शिवाजी कॉलेज मधील हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग विभागातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (ऑडिट) डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित गणवेश वाटप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे होते. तर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे आंतरविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ. रघुनाथ साळुंखे , राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. शिवाजीराव पाटील, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ .राज चव्हाण व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. तानाजी देवकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. नलवडे पुढे म्हणाले की रयत हा एक ब्रॅण्ड असल्याने येथील दर्जेदार शिक्षणांस व पदवीधरास मार्केट मध्ये वेगळे स्थान आहे. विद्यार्थ्यांनी हॉटेल मॅनेजमेंट करिता उभारण्यात आलेल्या पाच प्रशस्त प्रॅक्टिकल लॅबस् व अनुभवी प्राध्यापक वर्ग यांच्या ज्ञानाचा लाभ घेऊन हॉटेल इंडस्ट्री मध्ये देशात व परदेशात उत्तम करिअर करावे. हॉटेल मॅनेजमेंट मधील डिग्री घेतलेला विद्यार्थी हा जहाज सेवा, विमान सेवा, रेल्वे सेवा , आय.टी. क्षेत्र , थ्री स्टार , फाईव्ह स्टार हॉटेल्स ,मॉल्स, व विश्रामगृहे यांमध्ये उत्तम करिअर कऊ शकतो. त्याचबरोबर स्वतःचा हॉटेल व केटरिंगचा व्यवसाय सुरु करून अनेक जणांना नोकरीही देऊ शकतो. विद्यार्थ्यांनी भारतीय व पाश्चात्य शाकाहारी व मांसाहारी खादपदार्थ ,पेयजल व बेकरी पदार्थ,हाऊस किपिंग, फ्रंट डोअर, रेस्टॉरंट , बार व बँक्वेट हॉल व बफे सिस्टम यांमधील ज्ञान येथील लॅबस् मधील प्रात्यक्षिकांतून अवगत करावे.
अध्यक्षीय भाषणात प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे यांनी सांगितले की जगाच्या बाजारपेठेचा व अर्थशास्त्राचा अभ्यास करता आय.टी. व मेडिकल क्षेत्रा इतकेच कुशल मनुष्यबळास सन्माजनक धन व प्रतिष्ठा असणारे एक महत्त्वाचे क्षेत्र हॉटेल मॅनेजमेंट आहे. अभ्यासक्रमात हॉटेल मॅनेजमेंट बरोबरच फ्रेंच भाषा, व्यक्तिमत्व विकास, इंग्लिश कम्युनिकेशन, अकाउंट मॅनेजमेंट , योगा व इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इत्यादी विषय शिकण्याची सुविधा असल्याने छत्रपती शिवाजी कॉलेज मधील हॉटेल मॅनेजमेंटकडे प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नगर, जळगाव , सोलापूर, कोल्हापूर , सांगली व सातारा या भागातील विद्यार्थ्यांचा अधिक ओढा आहे. हॉटेल व्यवस्थापन इंडस्ट्रीत अतिथ्य, स्वच्छता, समयसूचकता व शिस्त याला अनन्यसाधारण महत्व आहे. ड्रेस कोड मुळे व्यक्तिमत्वाची प्रभावात्मकता वाढते व कामाच्या ठिकाणी उत्साह राहतो.तसेच ग्राहकांपर्यंत गुणवत्तापूर्ण अतिथ्य व सेवा पोहचवणेस मदत होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. समीर सपकाळ यांनी केले . तर पाहुण्यांचा परिचय हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे समन्वयक व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर डॉ.संदीप किर्दत यांनी करुन दिला. आभार प्रा. उदय गायकवाड यांनी मानले. यावेळी प्रा.यशराज थोरात, प्रा. रविंद्र महाजन, कार्यालयीन सेवक श्री.सीताराम गुंडाळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments